N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

'भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात मौज वाटते'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे मालक, संपादक यांना झालेल्या अटकेरून महाराष्ट्र सरकारवर आणीबाणी लादल्याचे व हुकूमशाहीचे आरोप करणाऱ्या भाजपचा शिवसेनेनं आज जोरदार समाचार घेतला आहे. 'अर्णब गोस्वामी यांस एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे. त्यांच्या अटकेचा राजकारणाशी, पत्रकारितेशी संबंध नाही. गोस्वामी म्हणजे कुणी टिळक-आगरकर नाहीत. त्यामुळं एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा. तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील,' असा बोचरी टीका शिवसेनेनं केली आहे. (Shiv Sena slams BJP in ) अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर मुंबईपासून दिल्लीपर्यंतचे भाजपचे नेते ठाकरे सरकारवर अक्षरश: तुटून पडले आहेत. केंद्रीय गृहमंत्री यांनीही हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, सरकारविरोधात मोर्चे काढा, उपोषणं करा, आंदोलनं करा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. भाजपच्या या भूमिकेवर 'सामना'च्या अग्रलेखातून आसूड ओढण्यात आले आहेत. अग्रलेखातील ठळक मुद्दे: महाराष्ट्रात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची आवई भाजपच्या महाराष्ट्रातील लोकांनी उठवली आहे. त्यांच्या जोडीला दिल्ली सरकारमधील अनुभवी शहाणेही सामील व्हावेत हे आश्चर्यच आहे. सीतेवर आरोप होताच श्रीरामानेही सीतेवर अग्निपरीक्षेची वेळ आणली. ते तर रामराज्य होते. सीतेची अग्निपरीक्षा म्हणजे आजच्या बेगडी रामभक्तांना आणीबाणी किंवा श्रीरामाची हुकूमशाही वाटली काय? कधीकाळी ‘काँग्रेस’ गवत हे अगदी निरुपयोगी उत्पादन म्हटले जात असे. ते केवळ निरुपयोगीच नव्हे तर चांगलेच उपद्रवी असल्याचे मत तेव्हाच्या राजकीय विरोधकांकडून व्यक्त केले जात होते. त्याच गवताचा काढा करून सध्याचे भाजपवाले दिवसातून दोन वेळा पीत असावेत असे त्यांचे वर्तन आहे. अर्णब गोस्वामी व त्यांची वृत्तवाहिनी कोणत्या प्रकारची पत्रकारिता करते? व त्यांच्या बरळण्यामागे कोणाची फूस आहे हे जगजाहीर आहे. सोप्या भाषेत ज्यास सुपारी पत्रकारिता म्हणावे तोच प्रकार आहे. गोस्वामी यांनी टिळक-आगरकरांप्रमाणे सरकारविरोधात जहाल लिखाण केले. त्यामुळे सरकारने त्यांची गचांडी पकडली असे काही हे प्रकरण नाही. गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर प्रमुख नेत्यांच्याबाबत गरळ ओकली म्हणून त्यास अटक झालेली नाही. त्याचा संबंध एका मृत्यू प्रकरणाशी जोडला आहे व मृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून ही कारवाई आहे. त्यामुळे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्याप्रमाणे ही अटक म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला वगैरे अजिबात नाही. वाचा: गुजरातमध्ये सरकारविरोधी लिहिणाऱ्या संपादकांना अटका झाल्या आहेत. उत्तर प्रदेशात पत्रकारांचे मुडदे पाडले गेले तेव्हा कोणाला आणीबाणीची आठवण का झाली नाही? महाराष्ट्राच्या भाजपवाल्यांनी अन्वय नाईक यांना न्याय मिळावा म्हणून वाद घालायला हवा. ते मराठी मातीचे पुत्र आहेत. पण भाजपवाल्यांना सवतीची पोरं मांडीवर खेळवण्यात अलीकडे मौज वाटू लागली आहे. मराठी माणूस मेला तरी चालेल, पण सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे असे त्यांचे धोरण स्पष्ट आहे. आणीबाणीचा काळ ज्यांनी अनुभवला आहे त्यातले एक लालकृष्ण आडवाणी हयात आहेत व आणीबाणी काय होती हे सध्याच्या नवशिक्यांनी त्यांच्याकडून समजून घेतले पाहिजे. कायद्यापुढे सगळे समान आहेत. वाचा: कायद्याने पंतप्रधान इंदिराजी, नरसिंह राव यांनाही सोडले नाही. अनेक मंत्र्यांना गजाआड जावे लागले. कायद्याच्या कारवाईला सामोरे जाऊन अमित शहादेखील तावून सुलाखून बाहेर पडले आहेत. एका निरपराध माणसाची आत्महत्या त्यांच्या वृद्ध आईसह झाली. त्यांची पत्नी न्यायासाठी आक्रोश करीत आहे. पोलिसांनी कायद्याचे पालन केले. यात चौथा स्तंभ कोसळला असे सांगणारे लोकशाहीतील पहिल्या स्तंभास उखडू पाहत आहेत. एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा! तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील! वाचा:

https://ift.tt/3fau8np
November 05, 2020 at 08:34AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा